मनात माझ्या

मनाला उजळून टाकते ती दिवाळी

पानी पे चमकती शामें

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका वयस्क ब्रिटिश जोडप्याबरोबर मी पणजी फिरायला गेलो. नर्कासुराची कथा त्या जोडप्याला सांगीतली तेव्हा त्यांनाही त्या उत्सवामागची भूमिका समजली आणि मौज कळली. फेरीमधून जातांना किनाऱ्यावरच्या दिव्यांमुळे लुकलुकणारं पाणी अजून माझ्या मनात ओलावा बनून राहिलं आहे. त्या एका स्मृतीचित्राने मला बरंच काही सुचवलं आहे.

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

कुरळ्या लहरींमधुनी

शीळ घालतो वारा

या पाडगांवकरांच्या कवितेला चाल देतांना गोव्याची हीच रात्र माझ्या डोळ्यासमोर तरळली होती. त्यानंतर जेव्हा मी लिहिलं होतं –

पानी पे चमकती शामें

हम रहते हैं दिल को थामे

और तेरी यादों के ठंडे साये

रहते हैं मन पे छाये

तेव्हासुद्धा गोव्यातल्या दिवाळीची संध्याकाळ माझ्या मनात साठून राहिली होती. शेवटी मनाला जी उजळून टाकते ती खरी दिवाळी, नाही का?

कौशल श्री. इनामदार

The URI to TrackBack this entry is: http://ksinamdar.wordpress.com/2008/10/21/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/trackback/

RSS feed for comments on this post.

Leave a Comment