शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून ‘शुभ्र कळ्या मूठभर’ नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं.

“गोड आहेत चाली.” त्या म्हणाल्या. “तुझ्या घरामध्ये संगीत आहे का?” त्यांनी प्रश्न केला.

“माझे आजोबा व्हायोलीन वाजवायचे.” मी उत्तर दिलं. “पुण्यात होते.”

“आमच्या काळात पुण्यात एक व्हायोलीन वादक होते. क्लासिकल आणि लाइट असं दोन्ही छान वाजवायचे. अतिशय गोड हात होता. शंकरराव बिनीवाले त्यांचं नाव.”

माझा ऊर अभिमानाने भरून आला. माणिकबाईंनी नेमकं हेच नाव घ्यावं हा अनोखा योगायोग होता.

“मी त्यांचाच नातू.” मी म्हणालो.

माझे आजोबा – शंकरराव बिनीवाले (आम्ही त्यांना अप्पासाहेब म्हणत असू) हे काळाच्या पडद्याआड जाऊन आता १४ वर्ष झाली. आणि १४ वर्षांपूर्वीच मी संगीत क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं – मी दिलेल्या पहिल्या चालीच्या रूपानं. माझ्या संगीतामधल्या वाटचाली मध्ये प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. आज मला राहून राहून वाटतं की एक संगीतकार म्हणून त्यांचा मला सहवास आणखी जास्त काळ लाभला असता तर मी अधिक श्रीमंत झालो असतो.

अप्पासाहेब अतिशय अबोल होते. स्वत:बद्दल तर ते क्वचितच बोलायचे. हेच एक कारण आहे की आज ही मला ते एका जिग्सॉ पझल सारखे उलगडत जाताहेत. अगदी आजही त्यांचा एक जुना फोटो, किंवा त्यांच्याबद्दल एखादं जुनं वर्तमानपत्रामधलं कात्रण त्यांच्याबद्दल काहीतरी नवीन सांगून जातं. आणि त्यांच्याबद्दल प्रत्येक नवीन कळणारी गोष्ट अचंबित करणारी असते.

त्यांच्याबद्दल माझ्या सगळ्या आठवणी त्यांच्या पुण्यातल्या केसरी वाड्याच्या समोरच्या २, नारायण पेठ या निवासस्थानाशी जोडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा भाऊ, विशाल, आजोळी राह्यला जात असू. वाड्याच्या दरवाज्यातून आत शिरताच आम्हाला काकी (म्हणजे आमची आजी) आणि अप्पासाहेब दारात आमची वाट पाहतांना दिसले नाहीत, असं माझ्यातरी काही स्मरणात नाही. आम्ही दिसताच काकी लगबगीने घराच्या दारात लावलेल्या अळूची पानं काढायची आणि अळुवड्या करायला घ्यायची. अप्पासाहेब ‘आलात का?’ असं म्हणत स्वागत करायचे.

अप्पासाहेब अबोल असले तरी नातवंडांना गोष्ट सांगताना त्यांना स्वत:च्या अबोल स्वभावाचा विसर पडत असावा. अरेबियन नाईट्स मधल्या कथा तर ते इतके रंगवून सांगत की आमच्या डोळ्यासमोर ते सगळं वातावरण उभं होत असे. त्यांची एक लाडकी कथा म्हणजे ‘सिंदबादच्या सात सफरी’. आम्ही जितके ऐकताना रंगून जायचो तितकेच ते सांगताना त्यात हरवून जायचे. मोठा झाल्यावर मी सिंदबादची कथा नव्याने पुस्तकात वाचली पण ती मजा कधीच आली नाही.

रात्री गोष्ट ऐकता ऐकता आम्हाला गुंगी यायची. अप्पासाहेब मात्र रात्री झोपत नसत. त्यांच्या तक्क्याच्या वरती ४-५ जर्मन व्हायोलीन्स्‍ लावून ठेवली असायची… आणि एक त्यांचं लाडकं व्हायोलीन त्यांच्या शेजारी असायचं. आम्ही अंथरुणात शिरलो की ते आपल्या व्हायोलीनच्या ब्रिजला ‘म्यूट’ लावत असत, ज्याने व्हायोलीनचा आवाज अगदी मंद होऊन जाई आणि मग रात्रभर ते रियाज करत. त्यांच्या व्हायोलीनचे सूर आम्हाला अलगद झोपेच्या कुशीत नेऊन ठेवायचे.

आता इतक्या वर्षांनी मला जाणीव होतेय की अप्पासाहेबांच्या गोष्टीतला सिंदबाद हे ते स्वत:च होते.

***

१९३३.

‘कॉन्टे रोस्सो’ नावाचं एक जहाज ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडच्या दिशेने प्रवास करत होतं. मुंबई बंदरावर हे जहाज लागलं आणि त्या जहाजावर २४ वर्षांचा एक तरूण चढला. त्याच्या हातामध्ये एक व्हायोलीनची केस होती. या तरूणाची इच्छा होती, की त्याच्या हातामधलं वाद्य जगाच्या ज्या कोपऱ्यातून आलंय तिथे जाऊन त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळवावं, तिथेच जाऊन ते वाद्य शिकावं. या तरूणाचं नाव होतं – शंकर गोपाळ बिनीवाले.

अप्पासाहेबांचा जन्म पुण्यातल्या सरदार बिनीवालेंच्या घराण्यातला. विसाजी कृष्ण बिनीवालेंच्या नवव्या पिढी पर्यंत पेशवेकालीन आब संपला होता. वडील लवकर गेल्यानंतर थोरले बंधु बाबासाहेब, यांच्या सल्ल्याने घरातल्याच सराफीचा व्यवसाय अप्पासाहेब पहायला लागले. पण त्यात त्यांचं मन रमेना. एके दिवशी अप्पासाहेबांना घरातल्या अडगळीत एक व्हायोलीन सापडलं. काही वर्षांपूर्वी बाबासाहेबांनीच ते खरेदी केलं होतं. अप्पासाहेबांची बोटं त्यावरून फिरायला लागली. घरातल्या मोठ्यांचा धाक वाटण्याचा तो काळ. कुणाला कळू नये म्हणून अप्पासाहेब वाड्यातल्या त्यांच्या वरच्या खोलीत व्हायोलीन वाजवत बसायचे. कुणीही न शिकवता हळू हळू आपल्याच बुद्धीने ते वाद्य आत्मसात करू लागले. मग एके दिवशी बाबासाहेबांनी त्यांचं व्हायोलीन ऐकलं आणि ते चकित झाले. कुणीही न शिकवता अप्पासाहेब उत्तमच व्हायोलीन वाजवू लागले होते. बाबासाहेब त्यांना गजाननबुवा जोशींकडे घेऊन गेले.

गजाननबुवांनी अप्पासाहेबांचं व्हायोलीन ऐकलं आणि इतके प्रभावित झाले की म्हणाले, “तुम्ही माझ्याबरोबर भारत गायन समाजात शिकवायला चला.”

पुढे गजाननबुवांनी अप्पासाहेबांना औंधला बोलावून घेतले. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे कीर्तनकार होते. अप्पासाहेब त्यांना साथ करू लागले. सहा महीने अप्पासाहेबांनी औंध मध्ये काढल्यानंतर ते पुण्यात परतले.

पुण्यामध्ये कृष्णा थिएटर मध्ये त्या काळात मूकपट लागत असत. तिथे अप्पासाहेब या मूकपटांना पार्श्वसंगीत देऊ लागले. हळुहळू त्यांची व्हायोलीनवादक म्हणून ख्याती पसरू लागली. काही लोक अप्पासाहेबांचं वादन ऐकण्याकरिता एक चित्रपट २ – ३ वेळा पाहू लागले.

मग प्रभात फिल्म कंपनीने ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट बनवायचं ठरवलं. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी गोविंदराव टेंबे यांच्यावर सोपवली. गोविंदरावांनी अप्पासाहेबांना बोलावून घेतलं. ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटात जे व्हायोलीन आपल्याला ऐकू येतं ते अप्पासाहेबांनी वाजवलं आहे.

पण अप्पासाहेबांमधला सिंदबाद त्यांना स्वस्थ बसू देईना. पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संगीताचा प्रसार करावा आणि त्याच वेळी आपण स्वत: पाश्चात्य संगीत आत्मसात करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात मूळ धरून राहिली. प्रभातच्या नोकरीमधून आणि काही कार्यक्रमातून साठलेली जी काही जमापूंजी होती, त्यामधून त्यांनी ‘कॉन्टे रोस्सो’ जहाजाचं तिकीट काढलं.

अप्पासाहेब जहाजामध्ये बसले तेव्हा मनात हेतू पक्का असला तरी युरोपमध्ये उतरल्यावर आपण नक्की कुठे जाणार आहोत हे पक्कं नव्हतं. पण योगायोग असा की ऑस्ट्रेलियाचा दौरा आटपून मायदेशी परत निघालेला एक इटालियन व्हायोलीनवादक, फेदेदेन्ये मारियानो, याच जहाजावर होता. एके दिवशी अप्पासाहेब आपल्या केबिनमध्ये रियाज करत असताना त्याने ऐकले आणि त्याने त्यांची चौकशी केली. त्यांच्या वादनाने तो चांगलाच प्रभावित झाला होता. तो म्हणाला – “तुम्ही माझ्याबरोबर इटलीला चला. माझ्या घरीच रहा. तुम्ही मला भारतीय संगीत शिकवा, मी तुम्हाला पाश्चात्य संगीत शिकवतो.”

मारियानो इटली आणि फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या व्हेन्तेमिलिया नावाच्या एका छोट्या गावात रहायचा. तो अप्पासाहेबांना आपल्यासोबत तिथे घेऊन गेला. सहा महिने अप्पासाहेब इटलीमध्ये राहिले आणि मारियानोकडे त्यांनी पाश्चात्त्य संगीताचे धडे घेतले. त्याच दरम्यान ते युरोपात भारतीय संगीताचे कार्यक्रम करू लागले. त्यांचं नाव आणि कीर्ति काही काळातच पसरली आणि मुसोलिनी – इटलीचा हुकुमशहा – याने अप्पासाहेबांना नेपल्सला आपल्या राजवाड्यात भेटीसाठी बोलावलं. त्या काळात मुसोलिनीची भेट म्हणजे जास्तीत जास्त ५-१० मिनिटं. पण अप्पासाहेबांशी चर्चेत मुसोलिनी चांगलाच रंगला आणि त्यांची भेट पाऊण तास रंगली. अप्पासाहेबांनी मुसोलिनीला नाट्यसंगीत आणि रागसंगीत असं दोन्ही या भेटीत वाजवून दाखवलं!

तिथून पुढे अप्पासाहेबांनी युरोपभरात अनेक कार्यक्रम केले. इटली मध्ये, फ्रान्सच्या कॅसिनो द पारी या प्रतिष्ठित थिएटर मध्ये, हॉलन्ड मध्ये, आणि इंग्लंड मध्ये. इंग्लंडमध्ये बी.बी.सी. वर सोलो व्हायोलीनचा कार्यक्रम करणारे अप्पासाहेब पहिले भारतीय कलावंत होते. लन्डन टाइम्स्‍, संडे रेफ़्री, अशा अनेक ब्रिटिश वर्तमानपत्रांतून अप्पासाहेबांबद्दल छापून येऊ लागलं. एका डच वर्तमानपत्राने तर अप्पासाहेबांना ‘ब्रिटिश-इंडियाचा येहुदी मेन्युहिन’ म्हणून संबोधलंय!

युरोपहून परतल्यानंतर या मितभाषी कलाकाराने आपल्या दौऱ्याच्या गौरवगाथा कुणाजवळ ही सांगितल्या नाहीत. आम्हाला ही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी खूप नंतर (काही गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर) समजल्या. परतल्यावर अप्पासाहेबांनी भालजी पेंढारकर आणि मो. ग. रांगणेकर या सारख्या दिग्दर्शकांच्या संस्थांमधून नोकरी केली. भालजी पेंढरकरांच्या ‘सावित्री’ या चित्रपटामध्ये व्हायोलीन हे अप्पासाहेबांनी वाजवलं आहे. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत ही त्यांनी राधामाई, कुलवधु सारख्या नाटकांमध्ये व्हायोलीनची साथ केली. या खेरीज विनायकबुवा पटवर्धन, पंडितराव नगरकर, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, सुलोचना पालकर, शांता आपटे, ज्योत्सनाबाई भोळे, शाहु मोडक, अशा गायकांना साथ करत असत. याच काळात त्यांचे स्वतंत्र कार्यक्रमही होऊ लागले होते. काही काळ त्यांनी मुंबईत ऑल इंडिया रेडियो आणि ‘यंग इंडिया’ ग्रामोफोन कंपनीतही नोकरी केली.

अखेर त्यांनी सगळ्या नोकऱ्यांना रामराम ठोकला आणि पुण्याला २, नारायण पेठ च्या आपल्या राहत्या घरात व्हायोलीन वादनाचा क्लास सुरू केला. माझ्या लहानपणीपर्यंत हा क्लास चालू असल्याचं माझ्या स्मरणात आहे. कित्येक वेळा क्लासनंतर काही विद्यार्थी मागे राहून काकीशी (माझ्या आजीशी) गप्पा मारत बसायचे. जितके अप्पासाहेब अबोल तितकीच काकी बोलघेवडी होती. तरीही अप्पासाहेबांशी गप्पा मारायला येण्याऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. भा. द. खेर (काकीचे बंधू) यांच्यासारख्या पत्रकार – साहित्यिकांपासून प्रताप मुळीकांसारख्या चित्रकारांपर्यंत अनेक लोक अप्पासाहेबांच्या मित्रपरिवारात होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.

अप्पासाहेबांची विनोदबुद्धीही अतिशय तल्लख होती. क्वचितच कधी ते जुन्या गोष्टी सांगण्याच्या मूड मध्ये यायचे तेव्हां आम्हाला या विनोदबुद्धीची एक झलक मिळायची. ‘सावित्री’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचं त्यांनी केलेलं वर्णन आठवलं की अजून मला हसू येतं. त्याकाळात प्लेबॅक पद्धत नव्हती. नटच गायचे आणि वादक ही कॅमेऱ्याच्या मागे, किंवा सेटवरच्या झाडाझुडुपात लपून आपआपली वाद्य वाजवायचे. तसे वादक ही ईन मीन तीन! तबला, ऑर्गन आणि व्हायोलीन! अप्पासाहेब सावित्रीची कथा सांगताना म्हणायचे –

“…मग यम सत्यवानाला त्याच्याबरोबर घेऊन जायचा. म्हणजे यम… त्याच्या मागे सत्यवान…. सत्यवानामागे सावित्री, सावित्रीमागे व्हायोलीन, व्हायोलीनमागे तबला…. तबल्यामागे ऑर्गन… अशी ती यात्रा निघे… आणि त्याच्या तालमी, टेक्स्‍ आणि रीटेक्स्‍!”

अप्पासाहेब कलाकार म्हणून जितके श्रेष्ठ होते, तितकेच अवलिया होते. लंडनमध्ये असताना प्रयोग म्हणून एक रेकॉर्ड त्यांनी केली होती. त्या रेकॉर्ड मध्ये एका बाजूला त्यांच्या व्हायोलीनवादनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या आईला डिक्टेट केलेलं एक पत्र होतं! पण भारतात आल्यानंतर –

“माझी अजून साधना व्हायची आहे- ” असं कारण सांगून त्यांनी आपलं एकही ध्वनिमुद्रण होऊ दिलं नाही.

काकी – अप्पासाहेबांचं लग्न झालं तेव्हा काकी पंधरा वर्षांची होती. अप्पासाहेबांनी आधी काय केलं असेल तर तिला तबल्यावर सगळे ठेके धरायला शिकवलं! त्या काळात असं करणं म्हणजे मोठं धाडस आणि बंडखोरीच होती!

काकी आणि अप्पासाहेब

काकी आणि अप्पासाहेब

काकी आणि अप्पासाहेबांचा संसार हा अप्पासाहेबांसारखाच अबोल होता. कधी कधी दिवसभरात ते एकमेकांशी एखादं वाक्यच बोलायचे! आम्हाला याची फार गंमत वाटे. माझा भाऊ, विशाल, खूप लहान असतांना न राहून त्याने काकीला प्रश्न केला.

“तुझं आणि अप्पासाहेबांचं पटत नाही का? तुम्ही एकमेकांशी काही सुद्धा बोलत नाही!”

नंतर नंतर आम्हाला त्यांच्या नि:शब्द संवादातलं प्रेम कळायला लागलं.

१९९४ साली आषाढी एकादशीला काकी गेली आणि त्यानंतर मात्र अप्पासाहेब खचले. जीवनात रस उरला नाही. काही वर्षांपूर्वी फेशियल पॅरलिसिसच्या झटक्यामुळे त्यांचं रात्रभराचं व्हायोलीनवादन बंद झालं होतं. पण संगीत हा त्यांच्या रोजच्या आयुष्यातला भाग राहिलाच होता. खूप संगीत ऐकयचे. पण काकी गेल्यानंतर संगीतही त्यांना नकोसं व्हायचं. काकीचं वर्षश्राद्ध झालं आणि अप्पासाहेबही आठवड्याभरातच गेले.

मला अप्पासाहेबांची ही सगळी रूपं आठवतात. मितभाषी, अबोल, खूप रंगवून अलिबाबा – सिंदबादच्या गोष्टी सांगणारे, रात्रभर म्यूट लावून व्हायोलीन वाजवणारे… मी त्यांचं व्हायोलीन झोपेतच खूप ऐकलं आहे. त्यामुळे त्यांचे सूर माझ्या अंतर्मनात भिनले आहेत. सकाळी सकाळी जाग यायची तेव्हां अप्पासाहेबांची भैरवी चालली असायची. आज ही कधीतरी अचानक पहाटे जाग येते आणि अप्पासाहेबांच्या व्हायोलीनचे सूर मला ऐकू येतात. अगदी ते समोर बसून वाजवत आहेत असा भास होतो. ते सूर मनात रेंगाळत राहतात आणि मी ही सिंदबाद सारखा सात सुरांच्या सफरीवर निघतो!

कौशल श्री. इनामदार

http://kaushalsinamdar.com

http://musicandnoise.blogspot.com

http://ksinamdar.wordpress.com


मनात माझ्या

मनाला उजळून टाकते ती दिवाळी

पानी पे चमकती शामें

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका वयस्क ब्रिटिश जोडप्याबरोबर मी पणजी फिरायला गेलो. नर्कासुराची कथा त्या जोडप्याला सांगीतली तेव्हा त्यांनाही त्या उत्सवामागची भूमिका समजली आणि मौज कळली. फेरीमधून जातांना किनाऱ्यावरच्या दिव्यांमुळे लुकलुकणारं पाणी अजून माझ्या मनात ओलावा बनून राहिलं आहे. त्या एका स्मृतीचित्राने मला बरंच काही सुचवलं आहे.

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

कुरळ्या लहरींमधुनी

शीळ घालतो वारा

या पाडगांवकरांच्या कवितेला चाल देतांना गोव्याची हीच रात्र माझ्या डोळ्यासमोर तरळली होती. त्यानंतर जेव्हा मी लिहिलं होतं –

पानी पे चमकती शामें

हम रहते हैं दिल को थामे

और तेरी यादों के ठंडे साये

रहते हैं मन पे छाये

तेव्हासुद्धा गोव्यातल्या दिवाळीची संध्याकाळ माझ्या मनात साठून राहिली होती. शेवटी मनाला जी उजळून टाकते ती खरी दिवाळी, नाही का?

कौशल श्री. इनामदार

हक़ीक़त ने ऐसा पक़डा गिरेबाँ

इट्स ब्रेकिंग न्यूज़ मधलं हे तिसरं गाणं मी माझ्या ब्लॉग वर अपलोड करत आहे. सोबत त्या गाण्यामागची कथा ही सांगितली आहे. आपण गाणं ऐकून आपला प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल.

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/haqeeqat-ne-aisa-pakda-girebaan-child.html

गीत इथे डाऊनलोड करता येईल.
http://ourmedia.org/allmedia&uid=69864

इट्स ब्रेकिंग न्यूज

गेल्या आठवड्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. इट्स ब्रेकिंग न्यूज हे त्या चित्रपटाचं नाव. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ इत्यादि वर्तमानपत्रांनी, तरण आदर्श, कोमल नहाता यांच्यासारख्या ‘ट्रेडगुरूं’नी या सिनेमाला आपली पावती दिली. तरी काही इंग्रजी दैनिकांनी या चित्रपटावर खूप वाईट शेरे मारले. खलिद महम्मद, ज्यांनी खुर्च्यांना खिळवून ठेवणारे दोन चित्रपट ‘तहज़ीब’ आणि ‘फ़िज़ा’ बनवले (म्हणजे खुर्च्या थिएटरला खिळून राहिल्या, लोक मात्र बिचारे उठून गेले), त्यांनी चित्रपट न पाहताच त्यावर समीक्षा लिहिण्याचा विश्वविक्रम ही केला. या चित्रपटामुळे काही पत्रकार दुखावले जाणार याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती. राजीव मसंद यांनी सीएनएन-आयबीएन वर केलेल्या समीक्षेत म्हटलं की दिग्दर्शकाने सिनेमात स्टिंग ऑपरेशन चित्रित करून तोच गुन्हा केलाय्‍ जो स्टिंग ऑपरेशन करणारे पत्रकार करतात. हे म्हणजे एका चित्रपटात एका अभिनेत्रीने वेश्येचं काम केलं तर ती ही वेश्याच आहे, असं म्हटल्यासारखं झालं.

सामान्य लोकांना हा चित्रपट आवडला आहे, हे जाहिर आहे. Yahoo.com, sulekha.com, bharatstudent.com, या संकेतस्थळांवर ही चित्रपटाचे चांगले रिपोर्ट्स आले आहेत. माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी या चित्रपटाची गाणी आणि त्याच्या मागची कथा लिहिली आहे. आपण ही गाणी ऐकून प्रतिक्रिया कळवल्यास मला खूप आनंद होईल.

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-second-song.html

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-first-song.html

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/it-breaking-news-trailers.html

क्षितिज जसें दिसतें…

क्षितिज जसें दिसतें

तशी म्हणावी गाणीं…

ग्रेसांचं लिखाण मला नेहमी गूढ वाटत आलं आहे, पण अनाकलनीय कधीच नाही. कविता ‘कळली’ नाही तरी जाणीवेच्या पातळीवर त्यांच्या कविता आपला परिणाम साधतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. माझी पहिली मराठीतली चाल ग्रेसांच्या कवितेला लागली यांचं मला आता दहा वर्षांनंतर अजिबातच नवल वाटत नाही. ती कविता होती ‘पाऊस कधीचा पडतो‘. चाल लागण्याची क्रिया ही ग्रेसांच्या कवितेइतकीच गूढ होती असं म्हणायला हरकत नाही.

मी, त्या काळी, रूपारेल कॉलेज मधे होतो… नाटकाने झपाटलेला. नाटकाच्या निमित्ताने संगीतामधल्या काही लोकांशी संबंध आला होता. त्यात कमलेश भडकमकर, अजित परब, ओंकार दादरकर, तनुजा जोग, शिल्पा पै ही सगळी मंडळी होती. मग नाटक सोडून आम्ही इतर ही बराच वेळ एकत्र घालवायचो. असंच एकदा रूपारेलच्या कँटीन मधे बसून कमलेश भडकमकर आणि मी चहा पीत होतो. आणि मी सहज गुणगुणलो…

“पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पानें

हलकेच जाग मज आली

दु:खाच्या मंद सुराने…”

कमलेशचे कान टवकारले.

“हे काय गातोय्‍स?” त्याने विचारलं.

“माहित नाही,” मी उत्तरलो, “गाणं आहे… बऱ्यापैकी लोकप्रिय आहे ना? मला या दोनच ओळी माहित आहेत.”

कमलेश म्हणाला, “शब्द बरोबर आहेत… पण चाल चुकीची गातोय्‍स. यशवंत देवांची चाल आहे याला.”

त्याने मला यशवंत देवांची चाल ऐकवली. मग तो पुढे म्हणाला –

“पण तू गात होतास ते ही चांगलं लागत होतं… तू पुढे करत का नाहीस ही चाल?”

मी घरी जाऊन माझ्या वडिलांच्या संग्रहातलं ‘संध्याकाळच्या कविता’ हे पुस्तक काढलं आणि या कवितेला चाल दिली. ती सुरावट कशी सुचली, अजून मला कळलेलं नाही. मला अजून ही वाटतंय‍्‍ की मी ती कुठेतरी, कधीतरी ऐकली असावी. असो. पण त्या मुळे मी एक मराठी संगीतकार झालो एवढं मात्र खरं. ती चाल माझ्या मित्रांना, घरच्या लोकांना ऐकवली आणि सगळ्यांनीच मला प्रोत्सान दिलं. माझ्या वडिलांनी मला या चाली निमित्त विल्यम गोल्डिंगचं ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’ हे पुस्तक ही भेट दिलं. आणि त्यानंतर झपाटल्यासारखं मी कवितांना चाली देत सुटलो.

पुढे काही दिवसांनी याच पुस्तकाची प्रस्तावना असावी अशी कविता – ‘क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी‘ – याला देखिल मी चाल लावली. कविता वाचली तेव्हा त्याचा अर्थ काहीच कळेना. यशवंत देवांचं म्हणणं असतं की कविता कळल्या शिवाय त्याला चाल देऊ नये. त्या निकषावर तर इथे कठीण होतं! पण मी कविता न कळताच चाल द्यायला सुरुवात केली आणि मला एक नवा अनुभव आला. तो असा की गाता गाता ती कविता मला उलगडत होती. ‘क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी‘ या ओळीचा अर्थ मला कळत नव्हता पण हळूहळू उलगडत होता. आपल्याला आपल्या खिडकीतून जसं आणि जितकं क्षितिज दिसतं तशी गाणी म्हणावी असा थोडासा भाबडा पण खरा वाटणारा अर्थ मला कळला होता. त्यानंतर काही वर्षे गेली आणि एके दिवशी खुद्द ग्रेस यांचाच मला फोन आला.

“माझ्या कवितांना तुम्ही छान चाली दिल्या आहेत असं मी ऐकलं, तेव्हा मला त्या ऐकण्याची इच्छा आहे.” – इति ग्रेस.

मला आनंद, भय, काळजी (स्वत:ची), हुरहूर, अशा विविध भावना एका वेळी अनुभवायला मिळाल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच ते संध्याकाळी माझ्या घरी येऊन ठेपले. घरी मित्रांची दाटी झाली होती ग्रेसना पहाण्यासाठी. ग्रेस काय बोलतायत‍्‍ याकडे सर्वांचं लक्ष होतं.

माझी सगळी गाणी शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले:

“खरोखरच चांगल्या चाली दिल्यात की तुम्ही. यातली ‘विराट घुमटातुनी‘ ची चाल तुम्ही मला रेकॉर्ड करून द्या.”

मग ते आपणहून त्यांच्या कवितांबद्दल बोलू लागले आणि जमलेले सर्व चाहते त्या बोलण्यात रंगून गेले. पुढे चर्चा त्यांच्यावर होणाऱ्या ‘दुर्बोधते’च्या आरोपावर गेली. त्यावर ते म्हणाले:

“काय दुर्बोध वाटतं माझ्या लेखनात? आणि तुम्हाला ग्रेस दुर्बोध वाटतो तर काय ज्ञानेश्वर सुबोध वाटतो? ‘क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी‘ यात काय दुर्बोध आहे?”

त्यांनी ती म्हणताक्षणी मला ती ओळ स्पष्ट दिसू लागली. खरंच्‍, यात आपल्याला काय वाटलं जे कळलं नाही? का इतकं साधं आपल्या लक्षात आलं नाही? त्यांनी ती ओळ उच्चारल्यावर आणखी ही काही संदर्भ स्पष्ट झाले. या ओळी मधे आपलं गाणं आपल्या दृष्टीशी आणि अंतर्दृष्टीशी प्रामाणिक असावं असा ही संकेत होता. एका क्षणातच मला माझ्या कलेकडे पहाण्याचा एक दृ्ष्टिकोन मिळाल्यासारखं वाटलं. खरं तर याच अर्थाचं पण यापेक्षा थोडं ढोबळ आणि (पाडगांवकरांच्या चाहत्यांची माफी मागून – ज्यात माझा ही समावेश आहे) थोडं कमी aesthetic विधान मंगेश पाडगांवकरांनी ही आपल्या कवितेमधून केलं होतं.

गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे

ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे.

मंगेश पाडगांवरांच्या ओळीं मधून कलेविषयी एका ठराविक मूल्याबद्दल माहिती मिळते किंवा पाडगांवकरांचं त्याविषयीचं मत कळतं. पण ग्रेस यांच्या ओळींमधून कलेविषयीच्या याच मूल्याबद्दल एक अंतर्दृष्टी मिळते. ग्रेस यांच्या ओळीमध्ये अनेक शक्यता दडल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमधे उलगडत रहाण्याची क्वॉलिटी आहे. आज ही या ओळी वेगवेगळ्या रूपात माझ्यासमोर येतच राहतात, आणि स्वत:ला उलगडत राहतात. आणि क्षितिज अधिकाधिक रुंद होत जातं…

© कौशल श्री. इनामदार, २००७.

Published in: on ऑगस्ट 21, 2007 at 7:41 सकाळी प्रतिक्रिया (20)